ईयोब

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42


धडा 8

नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले,
2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे उडत आहेत.
3 देव नेहमीच न्यायी असतो. तो सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या गोष्टी कधीच बदलत नाही.
4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून त्यांना देवाने शिक्षा केली.
5 परंतु ईयोब, आता तू त्याच्या कडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
6 तू जर चांगला आणि पवित्र असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरित येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
7 नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.
8 “वृध्दांना त्यांचे पूर्वज काय काय शिकले ते विचार.
9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत असे आपल्याला वाटते. सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण खूप लहान आहोत. छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस खूप कमी आहेत.
10 तुला कदाचित् वृध्द शिकवू शकतील. ते जे शिकले तेच तुलाही शिकवतील.”
11 बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
12 नाही, पाणी जेव्हा आटून जाते, तेव्हा तेही सुकून जातात. आणि कापून त्यांचा उपयोग ही करुन घेता येत नाही कारण ते खूपच लहान असतात.
13 जे लोक देवाला विसरतात ते या गवतासारखे असतात. जो देवाला विसरतो त्याला आशा नसते.
14 माथा टेकवण्यासाठी त्याच्या जवळ कुठेही जागा नसते. त्याची सुरक्षितता कोळ्याच्या जाळ्यासारखी असते.
15 तो जर कोळ्याच्या जाळ्यावर टेकला तर ते मोडेल. त्याने त्याचा आधार घेतला तरी ते त्याला आधार देऊ शकणार नाही.
16 मनुष्य खूप पाणी व सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा आहे. तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 परंतु ती वनस्पती तिच्या जागेवरुन हलवली तर मरते आणि कुणालाही तिथे ती कधी होती हे कळत नाही.
19 परंतु ती वनस्पती आनंदी असते कारण तिच्याच जागी दुसरी वनस्पतीवाढत असते.
20 देव निरागस लोकांना सोडून देत नाही. तो वाईट माणसांना मदतही करत नाही.
21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदी चित्कारांनी!
22 पण तुझे शत्रू मात्र लज्जेची वस्त्रे घालतील आणि दुष्ट माणसांची घरे नष्ट होतील.”