नीतिसूत्रे

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31


धडा 21

शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी खड्डे खणतात. पाण्याला दिशा देण्यासाठी ते वेगवेगळे खड्डे बुजवतात. त्याच रीतीने परमेश्वर राजाच्या मनावर ताबा मिळवतो. राजाने जिथे जावे असे परमेश्वराला वाटते तिथे परमेश्वर त्याला नेतो.
2 माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.
3 ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात.
4 गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.
5 काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि घाई घाईत गोष्टी केल्या तर तुम्ही गरीब व्हाल.
6 जर तुम्ही श्रीमंत होण्यासाठी लबाडी केलीत तर तुमची संपत्ती लवकरच नाहीशी होईल आणि तुमची संपत्तीच तुम्हाला मरणाचा मार्ग दाखवील.
7 दुष्ट लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्या त्यांचा नाश करतील. ते लोक योग्य गोष्टी गोष्टी करायला नकार देतात.
8 वाईट लोक नेहमी दुसऱ्यांना फसवायचा प्रयत्न करतात. पण चांगले लोक विश्वासू आणि न्यायी असतात.
9 सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.
10 दुष्ट लोकांना नेहमी वाईट गोष्टी करायच्या असतात आणि ते लोक त्यांच्या भोवतालच्या लोकांना दया दाखवत नाहीत.
11 जे लोक देवाची चेष्टा करतात त्यांना शिक्षा करा म्हणजे मूर्ख लोक धडा शिकतील. ते शहाणे होतील आणि नंतर त्यांना अधिकाधिक ज्ञान मिळेल.
12 देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील.
13 जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.
14 जर एखादा माणूस तुमच्यावर रागावला असला तर त्याला खाजगीरित्या एक भेट द्या. गुप्त भेट राग थोपवते.
15 योग्य न्याय चांगल्या लोकांना आनंदी बनवतो. पण तोच दुष्ट लोकांना घाबरतो.
16 जर एखाद्याने शहाणपणाचा मार्ग सोडला तर तो विनाशाकडे जातो.
17 जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही.
18 दुष्ट लोक चांगल्या माणसांवर जे अत्याचार करतात त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. जे लोक अप्रामाणिक असतात त्यांना प्रामाणिक लोकांवर केलेल्या अत्याचाराची किंमत मोजावी लागते.
19 वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
20 शहाणा माणूस त्याला लागणाऱ्या गोष्टी साठवून ठेवतो. पण मूर्ख माणूस त्याला मिळालेल्या वस्तू लगेच संपवून टाकतो.
21 जो माणूस नेहमी प्रेम आणि दया दाखवायचा प्रयत्न करतो त्याला चांगले आयुष्य, संपत्ती आणि मान मिळेल.
22 शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो.
23 माणसाने जर आपण काय बोलतो याची काळजी घेतली तर तो बऱ्याच संकटांतून सुटू शकेल.
24 गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.
25 आळशी माणूस अधिकाचा हव्यास धरुन आपला नाश करुन घेतो. तो स्वत:चा नाश करतो कारण तो त्या गोष्टींसाठी कष्ट करायला नकार देतो पण चांगला माणूस दान देतो कारण त्याच्याकडे भरपूर असते.
26
27 वाईट लोक जेव्हा, त्याला बळी अर्पण करतात तेव्हा परमेश्वर आनंदी नसतो. खास करुन त्यावेळी, ज्यावेळी वाईट लोक त्याच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात.
28 जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल.
29 चांगल्या माणसाला त्याचे नेहमी बरोबर असते हे माहीत असते. पण दुष्ट माणसाला तसा आव आणावा लागतो.
30 परमेश्वर ज्याच्या विरुद्व आहे अशी योजना यशस्वी करुन दाखविणारा एकही शहाणा माणूस नाही.
31 लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द जिंकू शकत नाहीत.